मंगळवेढा /प्रतिनिधी :-
मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात बदलत्या वातावरणामुळे मानवी जीवनावर परिणाम होत असून सर्दी, खोकला, ताप आदींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय व खाजगी दवाखाने हाऊस फुल्ल झाल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. दरम्यान मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात दैनंदिनी जवळपास ३५० रुग्ण ताप, सर्दी, खोकेल्याचे येत असल्याचे सांगण्यात आले.
सध्या सप्टेंबर महिना सुरु असतानाही अचानक वातावरणात बदल होवून ऑक्टोबर हिट जाणवत आहे. या बदलत्या वातावरणामुळे मानवी जीवनावर त्याचा परिणाम होवून लहान बालके, वृद्ध,तरुण आदी ताप, सर्दी,खोकला, अंगदुखी या आजाराला बळी पडत आहेत.
ग्रामीण रुग्णालयबरोबर खाजगी रुग्णालयातही रुग्णांची उपचारासाठी गर्दी पडत आहे. दि.१ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर दरम्यान १ हजार ८१६ रुग्णावर ताप,सर्दी,खोकला अंगदुखी या आजारावर उपचार केल्याचे सांगण्यात आले. पेशी तपासणे १ हजार १६५,टायफॉईड ५८, डेंग्यू ४८ रुण तपासले यामध्ये दोन संशयीत रुण डेंग्यूचे आढळले. मलेरिया ३१६ आदी रुग्ण या दरम्यान तपासण्यात आले आहेत.ग्रामीण रुगणालयाकडे पुरेसा औषधाचा साठा असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी अंगावर आजार न काढता तात्काळ उपचार करुन घ्यावेत असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुलोचना जानकर यांच्या वतीने करण्यात आले.