मंगळवेढा /प्रतिनिधी : -
लग्नात मानपान व्यवस्थित केला नसल्याचा व माहेरहून पैसे आण या कारणावरुन २० वर्षीय विवाहितेला मानसिक त्रास देवून तिचा छळ करुन ज्ञानेश्वरी दिपक गडदे हिला आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी नवरा दिपक शिवाजी गडदे (रा.नंदेश्वर) याला पोलीसांनी अटक करुन मंगळवेढा न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेची हकीकत अशी, यातील फिर्यादी किसन सोमा मासाळ (रा.गोणेवाडी) यांची मयत मुलगी ज्ञानेश्वरी हिचा विवाह नंदेश्वर येथील दिपक गडदे याच्यासोबत दि.२७ मे २०२४ मध्ये झाला होता. लग्न झाल्यापासून शोभा गडदे, शिवाजी गडदे,समाधान गडदे, दिपक गडदे हे सर्व माहेरहून पैसे आण म्हणून शारिरीक व मानसिक छळ करुन मारहाण करीत असे,वडिलांची परिस्थिती हालाकीची असल्याने मयत ही वडिलांना सांगू शकत नव्हती. वडिलाने मयत मुलीस विश्वासात घेवून विचारल्यानंतर तिने वरील हकीकत कथन केली.
दि.१० सप्टेंबर रोजी सकाळी ११.४५ वाजता राहते घरी तिने घरातील बेडरुम मध्ये असलेल्या लोखंडी हुकास ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली होती.याचा गुन्हा पोलीसात दाखल झाल्यानंतर तपासिक अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लातूरकर यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करुन मयताचा पती दिपक गडदे याला अटक करुन मंगळवेढा न्यायालयात उभे केले असता दि.१६ सप्टेंबर पर्यत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान उर्वरीत आरोपींनाही लवकरच अटक केली जाईल असे पोलीस सुत्राकडून सागण्यात आले.