मंगळवेढा /प्रतिनिधी :-
मंगळवेढा वीज वितरण कंपनी ग्रामीण अंतर्गत ब्रम्हपुरी,माचणूर,बठाण,मारापूर,उचेठाण,गुंजेगाव,ढवळस,शरद नगर आदी आठ गावामधून शेतकर्यांना सकाळी 9 ते सांयकाळी 5 या दरम्यान आठ तास विनाखंडीत शेतीसाठी वीज पुरवठा होत असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
राज्यभर शेतकर्यांना शेतीसाठी दिवसपाळी व रात्री पाळी या दोन शिफ्ट मध्ये गेल्या अनेक वर्षापासून कृषी पंपांना वीज पुरवठा केला जात असल्याने शेतकर्यांना वेळप्रसंगी रात्रीच्या वेळी अंधारात पिकांना पाणी देण्याची वेळ येत असे या प्रसंगी काही वेळा शेतकर्यांना सर्पदंश होवून त्यांच्या राज्यात मृत्यूचे संकट ओढावल्याचेही उदाहरणे आहेत.
मंगळवेढा ग्रामीण विभागाचे अभियंता प्रशांत गायकवाड यांनी सोलापूरचे अधिक्षक अभियंता सुनिल माने,पंढरपूर विभागाचे कार्यकारी प्रभारी अभियंता संजय शिंदे,मंगळवेढ्याचे संतोषकुमार मरळी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील आठ गावातून मागील महिन्यापासून शेती पंपासाठी सकाळी 9 ते सांयकाळी 5 या वेळेत अखंडीत वीज पुरवठा सुरु केल्याने शेतकर्यांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत.
सध्या रब्बी पिकाचा हंगाम सुरु असून यामध्ये गहू लागवड,ऊस लागवड व अन्य पिके लागवडीचा हंगाम सुरु असल्याने दिवसपाळीत या पिकांना पाणी देणे सुकर झाल्याने रात्रीच्यावेळी पिकाला पाणी देण्याचे संकट आता शेतकर्यांचे टळले आहे. सोलर वीजेच्या वापर करुन लोड समांतर करत मेंटेंस करुन वीज पुरवठा सुरु केला असल्याचे प्रशांत गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगीतले.
तसेच मागेल त्याला सौर कृषी पंप योजना व घरगुती सौर योजना कार्यान्वीत असून शेतकर्यांनी व ग्राहकांना याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.