मंगळवेढा/ प्रतिनिधी :-
कै. महादेव आवताडे यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा जपत समाजसेवेचा प्रवास अधिक दृढतेने आणि व्यापकतेने पुढे नेण्याचा निर्धार करूया आणि हीच त्यांना श्रद्धांजली असेल अशी भावना अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प सुधाकर इंगळे यांनी व्यक्त केली आहे. जिल्हा लेबर फेडरेशन चे माजी जेष्ठ संचालक
कै. महादेव बाबुराव आवताडे यांच्या २० व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रम वारकरी बांधव व ग्रामस्थांच्या उपस्थितीत अत्यंत श्रद्धाभावाने आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
पुढे मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, कै. आण्णांनी आयुष्यभर जपलेले संस्कार, प्रामाणिकपणा, कष्टाची परंपरा आणि समाजसेवेची निष्ठा हीच आमच्यासाठी दीपस्तंभ ठरली आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना, त्यांनी दिलेल्या मूल्यांची शिदोरी सोबत घेऊन सार्वजनिक जीवनात निष्ठा, पारदर्शकता आणि समर्पणाने कार्य करण्याचा संकल्प अधिक दृढ झाला. त्यांच्या आशीर्वादातूनच समाजहितासाठी झटण्याची प्रेरणा आजही अविरतपणे मार्गदर्शक ठरत आहे.
यावेळी उपस्थित समस्त वारकरी बांधव व पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील तसेच जिल्ह्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील सहकारी यांनी कै. आण्णांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या साध्या, कर्तृत्ववान आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्वाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या कार्याची आणि विचारांची परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यानिमित्ताने अधिक बळकट झाला आहे.
यावेळी जेष्ठ नेते बबनराव आवताडे, मार्गदर्शक विष्णूपंत आवताडे, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांतराव परिचारक, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार, उद्योगपती संजय आवताडे मालक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्यापारी आघाडी प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, युवक नेते प्रणव परिचारक, नगराध्यक्षा सुनंदा आवताडे, उपनगराध्यक्षा प्रा.येताळा भगत, भाजपा व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य, तसेच सर्व नगरसेवक, विविध गावांचे सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि इतर नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.