उपसा सिंचन योजनेतील कामाच्या प्रगतीची आमदार आवताडे यांचेकडून प्रत्यक्ष कार्यस्थळावर पाहणी
मंगळवेढा/प्रतिनिधी :-
पाण्याच्या प्रश्नावर विरोधाकाकडून अनेकदा राजकीय पोळ्या भाजण्याचे प्रकार झाले असले, तरी आम्ही कधीही पाण्यासाठी राजकारण केले नाही. पिढ्यान्पिढ्या टिकणारी योजना उभी राहावी, यासाठी बारकाईने लक्ष ठेवत असून दुष्काळात जन्मलो असलो तरी दुष्काळात मरणार नाही, या ठाम भावनेतूनच आपल्या भागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प असल्याचे प्रतिपादन आमदार समाधान आवताडे यांनी केले. २४ गावांच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामाची आमदार आवताडे यांनी लक्ष्मी दहिवडी येथे सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.
आमदार आवताडे म्हणाले की, दक्षिण मंगळवेढा भागातील पाण्याचा प्रश्न आता मार्गी लागत आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले असून लवकरच दुसऱ्या टप्प्याचे, तसेच मार्च महिन्यापर्यंत तिसऱ्या टप्प्याचे कामही सुरू होणार आहे. तिन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर २४ गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. त्याचबरोबर उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून मंगळवेढा तालुका विकासाच्या नव्या उंचीवर पोहचेल असा विश्वासही आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, दुष्काळाचा कलंक या भागावरून पुसायचा होता. अनेक अडचणींचा डोंगर पार करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला. म्हैसाळ योजनेतून १९ गावांना पाणी मिळाले आहे. पाण्याच्या प्रश्नावर अनेकांनी राजकीय पोळ्या भाजण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही कधीही पाण्यासाठी राजकारण केले नाही. ही योजना पिढ्यान्पिढ्या टिकणारी असून तिची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. आपल्या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा, हीच माझी मनोभावना आहे, असेही आमदार आवताडे यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव नागणे, नामदेव जानकर, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ, भाजपा तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, जिल्हा समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, माजी संचालक सुरेश भाकरे, सरोज काझी, पांडुरंग भाकरे, युवक नेते तानाजी काकडे, काशिनाथ पाटील, माजी नगराध्यक्ष प्रकाश गायकवाड कृषीभूषण अंकुश पडवळे, विनायक यादव, रावसाहेब चौगुले, लव्हाजी लेंडवे, डॉ संतोष लेंडवे, अशोक चौंडे, भीमराव मोरे, सुधाकर मासाळ, माजी संचालक विजय माने, धनंजय पाटील, शिवानंद पाटील, पप्पू स्वामी तसेच या भागातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य इतर पदाधिकारी, संबंधित खात्याचे प्रशासकीय अधिकारी व या भागातील ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.